दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानशी चर्चा कशी होऊ शकते? दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा अशक्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असे मत मांडले. पाकिस्ताननं पहिल्यांदा दहशतवादी कारवाया थांबवाव्यात त्यानंतर चर्चा होईल असं पाकला ठणकावलं. दरम्यान, भारतानं पाकिस्तानशी चर्चेसाठी वेळोवेळी हात पुढे केला आहे. पण, पाकिस्ताननं मात्र कायम दहशतवादाला पोसलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवाझ शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात चर्चेसाठी हात पुढे केला होता. पण पाकिस्ताननं मात्र दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या. शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर भारताचा कायम भर राहिला आहे. त्यासाठी चर्चेची देखील तयारी आहे. पण, पाकिस्तान मात्र भारताविरोधात दहशतवादी करावाया करत आहे. अशा वेळी चर्चास कशी होणार? असा खडा सवाल देखील राजनाथ सिंह यांनी केला.
वाचा – शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारापूर्वी मुलीचा जन्म; लष्करात पाठवण्याची आईची इच्छा
‘परिस्थितीमध्ये सुधारणा’
दरम्यान, मागील ४ महिन्यांची तुलना करता जम्मू – काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. जवानांनी देखील आपली कामगिरी चोख बजावली. म्हणूनच निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचं सर्व श्रेय भारतीय फौजेला जाते. अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह यांनी जम्मू – काश्मीरमधील काही नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जम्मू – काश्मीरमधील काही राजकीय संघटनांनी बहिष्कार टाकला होता. शिवाय मदतानाची टक्केवारी देखील घसरल्याचं चित्र पाहायाला मिळालं. पण, या निवडणुकीमध्ये भाजपला मात्र यश मिळालं.
दहशतवादी कारवायांमध्ये वाढ
जम्मू – काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतीय लष्कर याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दोनच दिवसांपूर्वी जवानांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण, यावेळी ३ जवानांना देखील आपले प्राण गमवावे लागले. शिवाय यावेळी झालेल्या स्फोटामध्ये ७ नागरिकांना देखील आपले प्राण गमवावे लागले.