पुलवामा जिल्ह्यातील कुलगाममध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. गुप्तपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. लष्कर आणि पोलिसांनी एकत्रितरित्या ही कारवाई केली आहे. ठार केलल्या दहशतवाद्यांमध्ये २ पाकिस्तानी तर एक दहशतवादी हा स्थानिक असल्याची माहिती आता समोर येत आहे. अद्याप देखील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरूच आहे. या कारवाईनंतर परिसरातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. शनिवार संध्याकाळपासून दहशतवाद्यांविरोधात केलेली ही दुसरी कारवाई आहे. सध्या दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली असून जवान देखील सावध झाले आहे. त्यामुळे सर्च ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांचा खात्मा केला जात आहे. कुलगाममध्ये झालेल्या कारवाईमध्ये एक जवान जखमी झाला आहे. मागील आठवड्याभरात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये टॉपचा दहशतवादी मनन वाणी याचा देखील समावेश आहे.
दहशतवाद्यांविरोधात आक्रमक आघाडी
दिवसेंदिवस दहशतवाद्यांची घुसखोरी वाढत आहे. त्याविरोधात आता लष्कर देखील आता आक्रमक झाले आहे. पाकिस्तानमध्ये सरकार बदलले पण दहशतवाद मात्र वाढतच आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराचा देखील पाठिंबा असल्याचे अनेक पुरावे पुढे आलेले आहेत. शिवाय पाक लष्कराकडून देखील वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्याला भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत. दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाई पाहता भारतानं देखील आता चोख प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे. शिवाय, पाकच्या आगळीकीला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश देखील सरकारने लष्कराला दिले आहेत.
जम्मू – काश्मीरमध्ये वाढती घुसखोरी पाहता भारतीय लष्कर देखील सर्च ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. शिवाय, मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा खात्मा देखील केला जात आहे. मागील आठवड्यामध्ये देखील १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रमजानच्या महिन्यापासून सुरू झालेली ही घुसखोरी अद्याप देखील कायम आहे. पाक लष्कराकडून देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांच्या खात्मासाठी जवानांसह आता स्थानिक पोलिसांनी देखील कंबर कसली आहे.