नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज निवड झाली. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी-नेहरू कटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळाला आहे. तथापि, निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीचे संकेत दिले होते.
देशामध्ये 2019मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला. तसेच गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्तीने अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. परंतु पक्ष कार्यकारिणीने ते अमान्य करत सोनिया गांधी यांच्याकडे या पदाची धुरा सोपविली होती.
#WATCH| "I can't comment on Congress President's role, that's for Mr Kharge (party's Presidential candidate) to comment on. The President will decide what my role is…", says Congress MP Rahul Gandhi, in Andhra Pradesh
Counting of votes to decide the Congress President underway pic.twitter.com/eRoRBY7QfX
— ANI (@ANI) October 19, 2022
त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या पदाच्या शर्यतीत कोण-कोण असणार याची चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली. खर्गे यांना जवळपास 8 हजार मते मिळाली तर, शशी थरूर यांना 1 हजार 72 मतांवर समाधान मानावे लागले. पण मतमोजणीआधीच राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशातील अदोनी येथे पत्रकारांशी बोलताना अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे विराजमान होणार असल्याचे संकेत दिले होते. ‘काँग्रेस अध्यक्षांची भूमिका काय असेल त्यावर मी भाष्य करणार नाही. ते खर्गे यांनी करायचे आहे. माझी पक्षातील भूमिका पक्षाध्यक्ष ठरवतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
मतमोजणीबाबत थरूर गटाला संशय
या निवडणूक प्रक्रियेत गंभीर स्वरुपाची अनियमितता असल्याचा आरोप शशी थरूर यांच्या गटाने केला होता. विशेषत: उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रियेत काहीतरी गडबड झाल्याचा दावा त्यांनी केला. थरूर यांचे निवडणूक एजंट सलमान सोज यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मते अवैध मानण्याची मागणी केली होती.
दोन दिवसांपूर्वी शरद पवारांकडून संकेत
मी जेव्हा काँग्रेस मध्ये होतो तेव्हा बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्या विरोधात निवडणूक लढलो होतो. आणि मी हरलो. तेव्हा पण सीताराम केसरी यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा मिळाला होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितले होते. या निवडणुकीतही खर्गे यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबाचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन होते.