पालघरमध्ये साधूंच्या हत्येवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत होती. आता उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून साधूंच्या हत्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. “अशा घटनेचे राजकारण करू नये, त्याला धार्मिक रंग देऊ नये. आम्ही जशी आरोपींवर कठोर कारवाई केली. तशीच कारवाई तुम्हीही कारवाई करावी”, असा टोला देखील ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला.
उत्तर प्रदेश येथील बुलंदशहरातील एका मंदिरात दोन साधूंची हत्या झाली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून साधूंच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटेनविरुद्ध आम्ही तुमच्यासोबत आहोत. ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली. त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कारवाई करून दोषींना कडक शिक्षा कराल, अशी अपेक्षा आहे. तसेच अशा घटनांचे राजकारण करू नका. त्याला धार्मिक रंग देऊ नका, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी योगींना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान पालघर येथील साधूंच्या हत्येनंतर राज्यात भाजपने गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केली होती.
संजय राऊत देखील म्हणाले शांतता राखा
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी ट्विट करत ही घटना अत्यंत निघृण आणि अमानूष असल्याचे म्हणत ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील असे ट्विट केले आहे.
बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या . मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची योगी अदितयनाथ यांच्याशी फोनवर चर्चा. साधु हत्ये बाबत चिंता वयकत केली. अशा अमानुष घटना घडतात तेव्हा राजकारण न करता आपण एकत्र काम करून गुन्हेगाराना शासन केले पाहिजे :ऊधदव ठाकरे
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2020
‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’
विशेष म्हणजे आता या प्रकरणावरून काँग्रेसने देखील भाजपला चिमटे काढले आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधुंच्या निर्घृण हत्येवर ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’, असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून सावंत यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेबाबत संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे हे निदर्शक आहे. पालघरच्या मॉबलिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या घटनेनंतर त्याच रात्री महाराष्ट्र पोलिसांनी धरपकड करून ११० आरोपींना ताब्यात घेतले व उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आली होती.
पालघरच्या घटनेसाठी चोरांची अफवा कारणीभूत असल्याचे तातडीनेच स्पष्ट झाले होते. तरीही भाजपने त्या घटनेला धार्मिक रंग देऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तोच भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत ‘कानठळ्या बसवणारे मौन’ धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याचे सचिन सावंत पुढे म्हणाले.