मुंबईतील लोक व पर्यटकांसाठी आकर्षणचे ठिकाण म्हणजे चित्रनगरी. त्याला फिल्मसिटी असेही संबोधले जाते. या चित्रनगरीत हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण होते. भले मोठमोठे वेगवेगळे सेट्स इथे पाहायला मिळतात. या मोकळ्या जागेत स्टुडिओ आहेत. तर तिथले काही सेट्स हे कायमस्वरुपी तत्वावर बांधलेले आहेत. तर काही सेट्स हे तात्पुरते बांधलेले आहेत. तात्पुरते बांधलेले सेट्स हे लाकडांचे बनवले जातात. त्यामुळे लाकडांचे बनवलेल्या सेट्सवरील चित्रीकरण पाऊस येण्याआधी आटपले जातात. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पावसापूर्वीच तात्पुरत्या बांधलेल्या सेट्सवरील चित्रीकरण पूर्ण करून ते सेट्स काढले जातात. कारण हे सेट्स लाकाडाचे असतात आणि पावसाच्या पाण्यात भिजून लाकूड खराब होऊ शकतात. ही लाकडे पुन्हा सेट्स बांधण्यासाठी वापरली जातात.
लाकडाचे सेट्स काढल्यानंतर पावसाळ्यात त्या जागेचे ताबेदार म्हणजेच तिथले आदिवासी लोक तिकडे शेती करून उत्पन्न घेतात. पावसाळा गेल्यानंतर पुन्हा ती जागा चित्रीकरणासाठी वापरली जाते. त्या जागेत मालिका किंवा चित्रपटाचा सेट पाहायला मिळतो.
फिल्मसिटीत ज्या ठिकाणी हिंदी चित्रपट केदारनाथचे चित्रीकरण झाले. त्या सेटवर पावसाला सुरूवात होण्यापूर्वी तिथले चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. त्या ठिकाणचे ताबेदार रावजी म्हणाले की या ठिकाणी आता पावसाळ्यात कोणताही सेट पाहायला मिळणार नाही. पावसाळ्यात इथे माझा भाऊ भाताची शेती करतो.
तर या संदर्भात चित्रनगरीत कलादिग्दर्शक म्हणून काम करणारे दिनेश शिंदे यांच्याकडून याबाबत जाणून घेतले. त्यावेळी ते म्हणाले की, शूटिंगसाठी सगळेच सेट हे कायमस्वरुपी तत्त्वावर नसतात. तात्पुरते सेट लाकूड व इतर गोष्टींचा वापर करून बनविले जातात. चित्रीकरण झाले की सेटसाठी वापरलेले सामान पुन्हा सेट बनवण्यासाठी वापरले जातात. पण, पावसाळ्यात लाकडांचे सेट्स खराब होऊ शकतात. त्यामुळे फिल्मसिटी येथे लाकडांचे सेट्स असणाऱ्या ठिकाणचे शूटिंग पावसापूर्वीच आटपले जाते. किंवा अशा सेट्सच्या भोवती लाकडाचे छप्पर बनविले जाते.
चित्रनगरीत उन्हाळ्याच्या ऋतूत शेतात काहीच पिकत नाही. म्हणून त्याकाळात ती जागा शूटिंगसाठी उपलब्ध करून दिली जाते. पावसाळा सुरू झाला की ज्या ठिकाणी शेती केली जाते ती जागा चित्रीकरणासाठी दिली जात नाही. त्या ठिकाणी पिक घेतले जाते.
–दिनेश शिंदे, कलादिग्दर्शक.
तेजल गावडे, मुंबई.