विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. अनुपम खेर स्टारकास्ट असलेला हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूप भावूक होताना दिसत आहे. असे असले तरी काश्मिरी पंडितांवर आधारित असलेला ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात काश्मिरी पंडितांसोबत काश्मिरमधील चुकीचे वर्तन आणि पंडितांचे पलायन दाखवण्यात आले आहे. या चित्रपटावरून राजकारणही तापले आहे. आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटातील वादावर आपले मत व्यक्त केले आहे. नाना पाटेकर म्हणाले की, ‘विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नाही.’
आजतक या हिंदी वृत्तसंस्थेशी बातचित करता नाना पाटेकर म्हणाले की, ‘भारतातील हिंदू आणि मुस्लिम येथे राहतात. दोघांसाठी शांततेने राहणे गरजेचे आहे. दोन्ही समुदायाला एकमेकांची गरज आहे. दोन्ही समुदाय एकमेकांशिवाय राहू शकत नाही. कोणत्याही एक चित्रपटामुळे असा वाद निर्माण होणे योग्य नाही. सर्व लोकं शांतेत राहत असताना अशावेळी विनाकारण हा वाद निर्माण करणे ठीक नाही. जो असे करत आहे, त्याच्याकडून उत्तर मागितले पाहिजे. चित्रपट पाहिल्यानंतर समाजाचे दोन भाग होतील. समाजात फूट पाडणे ठीक नाही.’
‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर असे बरेच कलाकार आहेत. सर्वांचे काम लोकांच्या खूप पसंतीस उतरले आहे.
हेही वाचा – ‘The Kashmir Files’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ कॅटेगरी सिक्युरिटी