‘श्री अम्मा यंगर अय्यप्पन’ म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी हिची आज पाचवी पुण्यतिथी. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईमध्ये श्रीदेवीचे आकस्मित निधन झाले. यावेळी ती तिच्या कुटुंबासोबत एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. पण अचानक तिचे ती दुबईमध्ये थांबलेल्या हॉटेलमध्ये मृतदेह सापडला. यानंतर श्रीदेवीच्या मृत्यूबाबत अनेक उलटसुलट चर्चा करण्यात आल्या. आज पाचव्या स्मृतिदिनानिमित्त श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी दुबईतील कौटुंबिक सोहळ्यातील फोटो पोस्ट करत “शेवटचा फोटो..” असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
बोनी कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामला शेअर केलेल्या या फोटोमध्ये श्रीदेवी आनंदी असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये बोनी यांची बहीण रीना कपूर देखील दिसत आहे. तीन दिवसांपूर्वी सुद्धा बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचा एक फोटो पोस्ट करत भावनिक पोस्ट केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बोनी यांनी लिहिले आहे की, “तु आम्हाला 5 वर्षांपूर्वी सोडून गेलीस… तुझे प्रेम आणि आठवणी कायम आमच्यासोबत राहतील…”
View this post on Instagram
श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने सुद्धा तिच्या आईसाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “मम्मा अजूनही मी तुला सर्वत्र शोधत आहे, तरीही तुला माझा अभिमान वाटेल या आशेने मी काम करत असते. मी कुठेही जाते, आणि मी जे काही करते – ते तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशीच संपते.” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
श्रीदेवी यांनी तब्बल 50 वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये काम केले. वयाच्या चौथ्या वर्षी श्रीदेवीने ‘कंधन करुणई’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. 50 वर्षात तिने 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये त्यांनी हिंदीतील 63, तेलुगू भाषेमध्ये 62, तामिळमध्ये 58 आणि मल्याळममधील 21 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 80च्या दशकात श्रीदेवी या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. श्रीदेवी या निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून लांब झाल्या होत्या.
हेही वाचा – हाफकिनने दीडशे कोटींच्या निविदा मंजुरीसाठी पुन्हा पाठवल्या; काय आहे कारण?
श्रीदेवीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण असे असले तरी ‘हिम्महतवाला’ या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. या सिनेमामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर याच चित्रपटामुळे जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमानंतर श्रीदेवीने आपल्या सिनेमांत काम करावे, म्हणून अनेक निर्माते-दिग्दर्शक रांगा लावायचे.