घरफिचर्सलोकशाही समाजवादाचे भाष्यकार

लोकशाही समाजवादाचे भाष्यकार

Subscribe

साने गुरुजी हे अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. परंतु साने गुरुजी या नावानेच ते ओळखले जात. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड (ता. दापोली, जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला, माध्यमिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे झाले. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो) पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्कूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०-३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नाशिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. तिरुचिरापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे, त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात, त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तर्‍हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले. समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुलाफुलांचे कवी म्हणून ते ओळखले जात. भारतीय संस्कृती म्हणजे काय हे अनेकांना कळावे म्हणून यांनी भारतीय संस्कृती या नावाचे सोप्या भाषेत पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची, मानवधर्माची अनेक उदाहरणे दिली आहेत.

- Advertisement -

साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती. तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).
अशा या थोर समाजसेवक, साहित्यिकाचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -