बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा आज स्मृतिदिन. बहिणाबाई या मराठी कवयित्री होत्या. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० रोजी असोदे (जळगाव जिल्हा) या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ‘लेवा गणबोली’ तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.
१९५० सालच्या जुलै-आगस्टमध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते. कविता चाळल्याबरोबर अत्रे उद्गारले ‘हे तर शंभर नंबरी सोने आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!’ आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यास पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणार्या या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.
बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, की कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञानाचे वेगळेपण आहे. बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.
खानदेशातील परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग या सार्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ठ्ये होत. अशा या थोर कवयित्रीचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.