लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा विवाह नसून दोन परिवाराचे एकत्रित येणे असे म्हटले जाते. लग्न टिकवण्यासाठी नवरा-बायकोचे नाते, त्यांच्यातील विश्वास, दोघांत असणारा समजूतदारपणा, प्रसंगी करावी लागणारी तडजोड यावर दोघांतील नातं अमर्याद टिकण्यास मदत होते. नवं नातं चांगलं वाटतं पण, काही दिवसांनी जोडीदाराच्या काही गोष्टी खटकतात. त्यावेळी नीट ती गोष्ट पटवून देता आली पाहिजे अन्यथा नात्याची गाठ सैल होऊ शकते.
हल्ली लग्नाचं वय झालं की, मुलीसाठी मुलगा बघताना मुलींना सरकारी नोकरीवाला, इंजिनिअर, डॉक्टर, सी.ए आणि मेट्रो सिटीत असेल तरच त्यास प्राधान्य दिले जाते. त्यातही वयाच्या २८-२९ व्या वर्षी स्वतःचे घर, चारचाकी गाडी, लाखोंच्या घरातील पगार मुलास असायला हवा.
हे सगळं मिळवताना त्याची होणारी परवड आणि वाढणारं वय अशा मुलाशी लग्न करण्यास मुलींची तयारी नसते. तर , मुलांच्या मुलींकडून असणार्या अपेक्षा म्हणजे ती जास्त शिकलेली असावी, नोकरी करणारीच हवी तसेच घरकाम, मुलांचे संगोपन तिनेच करावे. या सर्व अटी-अपेक्षांमुळे दोघांच्या मनात लग्न या संकल्पनेबद्दल सावळा गोंधळ दिसून येतो. क्रमशः