मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्यात समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाची उभारणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी तीन नवीन महामार्गाची उभारणी होणार आहे. (2 more new highways to be constructed in Maharashtra including Virar-Alibag)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटर काम पूर्ण होऊन झाले असून वाहतूक सुरू झाली आहे. तसेच उर्वरित 76 किमी लांबीचे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यापासून समृद्धी महामार्गावरून नागपूर ते मुंबई असा प्रवास करणे शक्य होणार आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, पुणे रिंग रोड आणि जालना-नांदेड समृद्धी महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गचा विस्तारित मार्ग विकसित करण्यात येणार आहे.
येत्या काही वर्षात राज्यात तयार होणाऱ्या 3 नवीन महामार्गाच्या कामांसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. तिन्ही प्रकल्पांचे काम 26 पॅकेजमध्ये होणार असून त्यासाठी 19 कंपन्यांनी 82 निविदा सादर केल्या आहेत. तसेच या प्रकल्पांसाठी इच्छुक कंपन्यांकडूनही निविदा मागवण्यात आल्या होत्या. गुरुवारी विशेष तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. एका पॅकेजच्या कामासाठी तीन ते पाच कंपन्यांनी निविदा दिल्याचे समोर आले आहे.
तीन नवीन महामार्ग कसे असतील?
- विरार-अलिबाग महामार्ग
विरार-अलिबाग महामार्ग 128 किलोमीटर लांबीचा बांधण्यात येणार असून तो पहिल्या टप्प्यात 96 किलोमीटर लांबीचा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर ते पेण आणि राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बलावली गावाचा समावेश आहे. एकूण 11 पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम केले जाणार असून यासाठी अंदाजे 60 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. - पुणे रिंगरोड
पुणे रिंगरोड हा महामार्ग शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. रिंग रोड 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंद असणार आहे, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. हा प्रकल्प 9 पॅकेजमध्ये केला जाणार असून पहिल्या टप्प्यात 136 किलोमीटर लांबीचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 16 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. - जालना-नांदेड समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत होणार असून जालना ते नांदेड असा 190 किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार आहे. जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एकूण 6 पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
Edited By – Rohit Patil