राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पंचनामे झाल्यानंतर पॅकेज जाहीर होईल, असं सांगितलं. जिथे जिथे नुकसान झालं आहे, तिथे शासनातर्फे जी काही मदत पोहचवायची ती आणि शिवसेना म्हणून जी काही मदत करायची आहे ती करतोय, असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ते चिपळूणमध्ये माध्यमांशी बोलत होते.
चिपळूण, महाड दोन्ही ठिकाणी गेलो. पाहणी नाही आहे, मदतीचं कार्य सुरु झालेलं आहे. पाऊस थोडा ओसरलेला आहे. जिथे जिथे नुकसान झालं आहे, तिथे शासनातर्फे जी काही मदत पोहचवायची ती आणि शिवसेना म्हणून जी काही मदत करायची आहे ती करतोय. प्रत्येक पक्ष मदत करत आहे. मदतीवरुन महाराष्ट्रात कोणीही राजकारण करत नाही आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत पॅकेज जाहीर करु असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. लोकांचं स्थलांतराचं काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात चिखल घरांमध्ये गेला आहे. त्यासाठी ज्या मशिन्स लागतात, सक्शन मशीन असेल, ती सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. कचऱ्याची विल्हेवाट महत्त्वाची आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हवामान परिषद, तसंच राज्यात काही करता येऊ शकतं का यावर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.