शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट निर्माण झाले आहेत. पक्षातील बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एकंदरीत हा सर्व प्रकार सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमची खरी संपत्ती पाहण्यासाठी दसरा मेळाव्याला आले असता तर दिसली असती. लोकांचं प्रेम हीच आमची खरी संपत्ती आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले की, कधी कुठल्या मिरवणुकीत गोळीबार होतो. तर कधी कार्यालय फोडलं जातं. तरीही गद्दारांवर काहीच कारवाई केली जात नाही. या राज्याचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर गेलं नव्हतं. भास्कर जाधवांची पोलीस सुरक्षा काढण्यात आल्यानंतर बरोबर एक-दोन तासांनंतर हल्ला झाला आहे. या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का, यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयात दाखळ करण्यात आलेल्या याचिकेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यांची दोन्ही मुलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे.