आकाशवाणी पुणे केंद्राच्या निवेदिका सुधा नरवणे (८८) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नरवणे या पुणे आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारीत होणाऱ्या सकाळच्या बातम्या द्यायच्या. उत्तम स्वरात दररोज सकाळी सातच्या बातम्यांची त्यांच्या श्रोत्यांना सवयच लागली होती. त्यांच्या जाण्याने श्रोत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती मुकुंद नरवणे, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.
निवेदिका सुधा नरवणे यांच्याविषयी…
आकाशवाणीच्या एक उत्तम निवेदिका सुधा नरवणे या पुणे केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे निवेदन करत होत्या. त्यांचा आवाज आणि सकाळच्या बातम्या यांचे एक समीकरण झाले होते. निवेदिका सुधा या उत्तम निवेदिकाच नसून त्या एक लेखिका देखील होत्या. नरवणे यांनी दहा वर्षांहून अधिक काळ ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या प्रादेशिक केंद्राच्या निवेदिका म्हणून काम केले होते. सुधा यांचा आवाज इतका ओळखीचा झाला होता की, मराठी श्रोते त्यांचा आवाज सहज ओळखायचे.
नरवणे यांची लिहिलेली आणि अनुवाद केलेली पुस्तक
आकाशवाणीच्या निवेदिका सुधा नरवणे यांच्या निवेदिकेच्या कारकिर्दीसह त्या उत्तम लेखिका होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. तरुण वयातच त्यांनी आपल्या लिखाणाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत लघुकथा, लघुनिबंध याचे लेखन केले आहे. तर इंद्रधनू ते अठरा सेकंद, लामणदिवा, जननी : माता, कन्या, मातृत्व, इतवा मुंडाने लढाई जिंकली : आदिवासी जीवनावरील कथा इत्यादी त्यांनी लिहिलेली आणि अनुवाद केलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर सत्यकथा, किर्लोस्कर, हंस, स्त्री, माणूस अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते. तसेच राज्य पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा सन्मान केला आहे. निवेदिका सुधा नरवणे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या अनेक श्रोत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.