मुंबई : सत्तेत जरी शिंदेची शिवसेना आणि भाजप असले तरी सध्याचे राजकारण ‘मातोश्री’ आणि ‘सिल्व्हर ओक’ भोवतीच फिरतना दिसत आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान त्यांनी आज येवल्यानंतर मराठवाड्यातील बीडमध्ये स्वाभिमान सभा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील एक पक्ष सक्रीय असताना आता याच आघाडीतील शिवसेना(उद्धव ठाकरे गट) सक्रीय झाला असून, उद्धव ठाकरेसुद्धा मराठवाडा दौऱ्यावर जाणार असून, 27 ऑगस्ट रोजी ते हिंगोलीत जाहीर सभा घेणार आहेत.(Another party in MVA also active in Marathwada Uddhav Thackeray’s meeting in Hingoli at the end of the month)
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करून याबाबत माहिती दिली आहे. 27 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असून, हिंगोलीतील रामलीला मैदानांवर त्यांची सभा होणार आहे. तेव्हा या सभेत ते हिंगोलेचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांच्यावर कशा निशाणा साधतात हे या सभेनंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : “माझे वय झाले असे तुम्ही म्हणता…”, शरद पवारांची अमरसिंग पंडितांवर टीका
मराठवाड्यातच पडले होते सर्वात मोठे खिंडार
शिंदे गटाने शिवसेनेत बंड करीत भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. शिंदेना साथ देणाऱ्या 40 आमदारांपैकी सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील होते. यामध्ये अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल यांच्यासह हिंगोलेचे संतोष बांगर यांच्यासह शिवसेनेचे मराठवाड्यातील 12 पैकी आठ आमदार फुटले होते. तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे बीड, लातूर, नांदेड, जालना व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सेनेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिल्लक नाहीत. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार मिळवणे हे शिवसेनेपुढील एक आव्हान ठरण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी परभणी जिल्ह्यातील शिवसेनेतील आमदार व खासदार उद्धव ठाकरे यांच्या समतवेत असल्याचे दिसून येत आहे.
संतोष बांगर यांचा घेतला जाणार खरपूस समाचार
सत्तांतरात सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या पैजा, दाव्यामुळे चर्चेत राहले आहेत. सोबतच त्यांच्या वादग्रस्त ऑडीओ, व्हि़डीओ व्हायरलमुळेही ते स्थानिकांसह राज्यातील राजकारण्यांच्या निशाण्यावर होते. आता त्यांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याने त्यांचा कश्याप्रकारे समाचार घेतल्या जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.