मुंबई : मागील 2 आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या मान्सूनने अखेर शनिवारी राज्यात दणक्यात आगमन केले. पण पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रमाण लक्षणीय होते. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (CM Eknath Shinde) सडकून टीका केली. त्याला आज भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत पाऊस पडल्यानंतर एक वेगळा अनुभव असतो, मुंबईकरांना पाऊस नेहमी आवडतो आणि ते नेहमीच स्वागत करतात. पण शनिवारी ज्या-ज्या मुंबईकरांनी ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर, पाणी जिथे तुंबलं तिथे अडकल्यानंतर फोटो ट्वीट केले. शिवाजी पार्कचा परिसर, अंधेरीमध्ये काही भागा अशा काही ठिकाणी पाणी तुंबले जिथे कधीच तुंबले नव्हते, याकडे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लक्ष वेधले होते.
तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात…
उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत.
काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली…म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी… pic.twitter.com/TsxDnDfMag
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 26, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यावरील वक्तव्य पाहिले तेव्हा, मुंबईकर म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला राग आलेला आहे. पाऊस आल्याचे स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबल्याची तक्रार काय करता. असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हे निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आणि भ्रष्टाचारचे वक्तव्य असल्याची टीकाही त्यांनी केली होती. तासाभरात जेव्हा 300 ते 400 मिमी पाऊस पडत होता, तेव्हा मी, आमच्या महापौर आणि खुद्द उद्धव ठाकरे हे बाहेर पडून जनतेशी संपर्क साधत होतो, असा दावाही त्यांनी केला होता.
यावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार एड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मातोश्रीच्या युवराजांनी, आपल्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले, असा दावा केला आहे. पण मुंबईत एका तासात 400 मिमी एवढा पाऊस कधी पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला सुद्धा एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता, असे सांगत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी, असा टोलाही आमदार शेलार यांनी लगावला आहे.