मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे ला होणाऱ्या औरंगाबद सभेला पोलिसांनी अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे १ मे रोजी औरंगाबादमध्ये राजगर्जना होणार हे निश्चित झालं. तथापि, या सभेला पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल १६ अटींसह ही परवानगी दिली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार असून मनसेने याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झालं. ३ मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेला अनेक पक्ष आणि संघटनांकडून तिव्र विरोध झाला. अखेर, अटीशर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे.
अशा आहेत अटी
सभा दुपारी ४.३० ते रात्री ९.३० च्या दरम्यान आयोजित करावी.
सभेत सहभागी होणाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळावी, असभ्य वर्तन करु नये
सभेसाठी १५ हजारपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये
सभेत शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत
वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरुन चिथावणी देऊ नये
पोलिसांनी दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा
चेंगराचेंगरी, गोंधळ झाल्यास संयोजकांना जबाबदार धरलं जाईल
सर्व अटींची माहिती संयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी
सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेड्स उभारावे
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं
शहरातील वाहतूक, रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवेला अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी
वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी
विद्युत यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी
सभेदरम्यान मिठाई, अन्नाचं वाटप असल्यास विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी
वरील नियमांचं उल्लंघन केल्यास संयोजक, वक्त्यांवर कारवाई केली जाईल