माशांचा प्रजनन काळ लक्षात घेऊन त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यात येत्या १ जूनपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातल्याची माहिती विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी दिली आहे. बंदीच्या कालावधीत मच्छीमार यांत्रिकी नौकेद्वारे मासेमारी करताना आढळल्यास अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही देवरे यांनी स्पष्ट केले आहे. (Ban on fishing from June 1 to July 31, orders issued by Fisheries Department)
मासेमारीसाठी बंदी घातल्याने उरण येथील करंजा व मोरा बंदरामध्ये समुद्रकिनारी नौका लागण्यास सुरुवात झाली आहे. नौका नांगरुन त्या शाकारण्यास मच्छिमारांनी सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यात ४ हजार ९४३ मासेमारी नौका आहेत. त्यातील ३ हजार ४४४ यांत्रिकी नौका आहेत. त्यामुळे सरकारने दिलेल्या आदेशानुसार नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही.
१ जून २०२१च्या आधी मासेमारीसाठी गेलेल्या नौकांना १ जून २०२१नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरण्यास परवानगी देण्यात येणार नाही. नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम,१९८१ च्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे ३१ मे आधी मासेमारी नौका बंदरात पोहचणे महत्त्वाचे आहे. सर्व नौकामालकांना याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जून महिन्यात माशांचा प्रजनन काळ असतो. त्याचप्रमाणे या दिवसात समुद्राला उधाण आलेले असते. त्यामुळे बोटींचे नुकसान होऊ नये तसेच कोणताही जिवीत हानी होऊ नये यासाठी दरवर्षी दोन महिने समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते.
हेही वाचा – ऊसाच्या शेतात आढळले ८ दिवसांचे दोन बिबट्याचे बछडे