मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. दि. २३ जुलै रोजी औरंगाबाद येथे गंगापूरच्या काकासाहेब शिंदे (२८) याने जलसमाधी घेत आत्महत्या केली होती. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कायगाव येथील पुलाला काकासाहेब शिंदे याचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भातील फलक देखील आज या परिसरात लावण्यात आले.
२३ जुलैला काकासाहेब शिंदे यांनी कायगावातील गोदावरी नदीत उडी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. या नंतर संतप्त मराठी आंदोलकांनी आक्रमक होत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर झालेली आहे. तसेच त्याच्या भावाला सरकारी नोकरी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिंदेच्या आत्महत्येनंतर राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरु झाले आहे. आतापर्यंत चार तरुणांनी आत्महत्या केलेली आहे.
त्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटलेले बघायला मिळाले. मराठा आंदोलकांनी २६ जुलै रोजी मुंबई बंदचीही हाक देत एक दिवस मुंबईतही हिसंक आंदोलन केले होते. मुंबईतील आंदोलन थांबले तरी राज्यभरात आंदोलनाची आग अजूनही धुमसत आहे. आज १ ऑगस्ट रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन झाले.