वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील तरुणीच्या उपचारांचा सर्व खर्च प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी उचलण्याची तयारी दर्शवली आहे. संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती आनंद महिंद्रांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. ‘पीडित तरूणीला किंवा तिच्या कुटुंबीयांना कोणी ओळखत असेल तर कृपया त्यांची माहिती मला द्या असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे’.
Unimaginable cruelty. A life devastated.Even more cruel when we turn the page of the newspaper & move on. How is she managing her medical expenses? If anyone knows her/her family please let me know how I can help. I don’t just want to turn the page. https://t.co/KLUp2vGcYA
— anand mahindra (@anandmahindra) February 6, 2020
वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून विक्की नगराळे या नराधमाने हिंगणघाट येथील शिक्षक तरूणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. पीडित तरूणी कॉलेजच्या दिशेने जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेचा सर्व स्थरातून विरोध होत आहे. या तरूणीवर सध्या नागपूर येथील ऑरेंज सिटी रूग्णालयात अतिदक्षता विभागात अपचार सुरू आहेत.
हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेनंतर सर्व स्थरातून याचा विरोध होत असून अनेक ठिकाणी पीडित तरूणीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना होत आहे. या घटने नंतर कायम सामाजिक घटनेंवर भाष्य करणारे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे कि, ‘ही क्रुरता कल्पनेच्या पलिकडची आहे. ही घटना विचार करून सोडून देण्यासारखी नाही. तिचे कुटुंब तिच्या उपचारांचा खर्च कसा करत असेल? हा प्रश्न मला पडलाय. कुणालाही या तरूणी बद्दल किंवा तिच्या कुटुंबीयांबद्दल कळल्यास कृपया याची माहिती मला कळवा. मला केवळ वर्तमानपत्राचे पान उलटून पुढे जायचे नाही,’ असे भावनिक ट्विट त्यांनी केले आहे.
या आधी देखील उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुरत येथील जन्मापासून दिव्यांग असलेल्या साठ वर्षीय विष्णू पटेल यांच्या व्यवसायासाठी एक कोटीचा निधी उभारण्याची घोषणा केली होती. जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या पटेल यांनी मोटरसायकलचे टाकाऊ भाग, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या बॅटरींचा उपयोग करून चक्क ई-बाइकची निर्मिती केली. पटेल यांनी तयार केलेली ई-बाइक बघून उद्योगपती आनंद महिंद्रा भारावले. त्यानंतर त्यांनी मदत करण्यासह एक कोटी निधी उभारण्याची घोषणा केली होती.