राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या १०० दिवसांच्या कामकाजाचे मूल्यमापन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.
हेही वाचा – Coronavirus: इराणमधून ५२ विद्यार्थ्यांची केली सुटका
राज्यातील आघाडीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी जन्माला आलेले नाहीत. ते नेता म्हणूनही जन्माला आलेले नाहीत. ते वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. उद्धव ठाकरेंना हेक्टर आणि एकर यातला फरक माहित नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
अजित पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करावीशी वाटू लागली आहे. कारण महाविकास आघाडीचे सरकार असतानाही उपमुख्यमंत्री, त्यांचे सरकार असतानाही उपमुख्यमंत्री, सिंचन घोटाळा केला तरी काही नाही, शेतकऱ्यांना वाईट बोलले तरी काही नाही. कधी चिडून राजीनामा देतात. पण इतके सगळे केल्यानंतरही ते मध्यवर्ती आहेत,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.