घरताज्या घडामोडीभाजपचा अट्टाहास म्हणजे हुकूमशाहीची नांदी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

भाजपचा अट्टाहास म्हणजे हुकूमशाहीची नांदी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

Subscribe

भाजप ही हिटलरच्या पावलावर पाऊल टाकणारी ही पार्टी असून वेळीच त्यांना रोखायला हवे. त्यासाठीच तळागाळात फिरून त्यांचे मुस्लिम प्रेम, त्यांचे बेगडी देशप्रेम याचा पर्दाफाश करा आणि शिवसैनिक अंगार असतो हे त्या भंगाराना दाखवून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

देशात पंचायत ते संसद असे भाजपचे स्वप्न असून सत्तेच्या ठिकाणी दुसरे कोणी असता कामा नये.आपल्याच बुडाखाली संपूर्ण देश हवा असा त्यांचा अट्टहास असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे, असा जबरदस्त घणाघात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर केला.

भाजप ही हिटलरच्या पावलावर पाऊल टाकणारी ही पार्टी असून वेळीच त्यांना रोखायला हवे. त्यासाठीच तळागाळात फिरून त्यांचे मुस्लिम प्रेम, त्यांचे बेगडी देशप्रेम याचा पर्दाफाश करा आणि शिवसैनिक अंगार असतो हे त्या भंगाराना दाखवून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच खासदारांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम २२ मार्चपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी ठाकरे यांनी मेलो तरी एमआयएमशी युती करणार नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे यांनी  यामागे भाजपचाच डाव असल्याचा आरोप केला.

आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला नाही याचा पुनरुच्चार करत ठाकरे म्हणाले, विरोधकांचे, भाजपचे धोरण ओळखा. भाजपकडे काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने ते आपल्यावर टीका करत आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी देदीप्यमान विजय मिळवला असे काही नाही, उलटपक्षी त्यांच्या जागा कमी झाल्या. समाजवादी पक्षाच्या आधीपेक्षा जागा वाढल्या आहेत. मात्र भाजप एक भ्रम निर्माण करीत असून संमोहित करण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

हिटरलने प्रवक्त्यांच्या चार फळ्या केल्या होत्या. आपण केलेली कामे जनतेसमोर मांडणे, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणे, विरोधकांवर आरोप करणे या तीन फळ्या होत्या. अफवा पसरवणे ही चौथी फळी होती आणि तेच आज भाजप करत आहे. हिटलरच्या पावलावर पाऊल टाकणारी ही पार्टी आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष, भीती निर्माण करणे आणि आपणच तारणहार आहोत हे बिंबवणे उत्तर प्रदेशात झाले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन तुम्ही आम्हाला मुस्लीमधार्जिणे ठरवत आहात. तुम्ही आम्हाला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलायचे? मुस्लिमबहुल  भागात उर्दू शाळा सुरू करण्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. मग आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचे का? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मोदी, अमित शाह आणि ज्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहत असते ते उत्तर देऊ शकतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केली.

शिवसेनेला जनाबसेना म्हटले जात यामागे भाजपचा डाव आहे. काहीही संबंध नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली, त्यानंतर लगेचच भाजपने टीकेचा भडीमार सुरु केला. वास्तविक औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत आम्ही मेलो तरी जाणार नाही. मात्र उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचे. आम्ही भाजपासारखे सत्तेसाठी लाचार नाही. अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यांचे नुसते जबाब घेतले तर यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात, असे सांगत ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते. पण या गेल्या सात वर्षात काय झालं ते सांगा? काहीच नाही, दुसऱ्यांना देशद्रोही ठरवणे, पाकधार्जिणा, दाऊदचा हस्तक ठरवणे एवढेच काम यांच्याकडून झाले आहे. आता चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला, त्यावेळी सरकार भाजपने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचे होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण ते पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपने तेव्हा एकही अवाक्षर काढले नव्हते. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती,असे ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचे प्रहार

पूर्वी इस्लाम खतरे मे है म्हणायचे, आता हिंदू खतरे मे अशी नवीन बांग त्यांची सुरु आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची. इतिहासाच्या खपला काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा भ्रम निर्माण केला जात आहे. एक दिवस कदाचित हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत, आम्हीच हिंदू धर्माची स्थापन केली असेही म्हणायला भाजप कमी करणार नाही. पण तो त्यांचा मानसिक आजार असेल. दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे.

विधानसभेतील १२ आमदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असे ते म्हणत असले तरी वस्तुस्थिती नाही.  न्यायालयाने अधिकार अमान्य केला नसून किंवा शिक्षा रद्द केली नाही तर फक्त कालावधी कमी करा  असे सांगितले आहे. या छोट्या गोष्टी लोकांसमोर मांडणे गरजेचे  आहे.

आम्हाला पाकधार्जिणी म्हणणार असाल तर जास्त गोष्टी तुमच्याच काळात झाल्या. वाजपेयींनीच भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती. इथपासून ते नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी, हे सर्व आम्ही पाहत आहोत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झाले हे पाहिले आहे. आम्ही तुम्हाला पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचे सोडणार नाही पण तुमचे उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ.

आम्ही झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही. ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची १०० टक्के खात्री आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे. धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करणे ही त्यामागची चाल आहे.

औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकणारी जी औलाद आहे, तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही. भाजपचे मुस्लीमप्रेम जनतेसमोर आणा, शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या.

भाजपच्या परंपरागत मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार तयार करून जिकंण्याची तयारी ठेवा आणि भाजपने जो काही भितीचा बागुलबुवा लोकांच्या मनात निर्माण केला आहे तो काढण्यासाठी काम करा.


हेही वाचा –  महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -