आगामी विधानसभेसाठी मुंबईचा किल्ला काबीज करण्यासाठी युती आणि आघाडी दोघांची ही मोर्चेबांधणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु झाली होती. त्यानुसार मुंबईतील दहा जागांवर कोणात्या पक्षांचे उमेदवार द्यायचे यासाठी दोघांमध्ये मोठा प्रश्नचिन्ह उभा ठोकला होता. अखेर आघाडीतील हा तिढा दूर झाला असून मुंबईतील दहा ही जागांवर उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय शनिवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत झाल्याची माहिती पुढे आली आहे. विधानसभा निवडणुकीच्यासाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली. त्यात सर्वांचे लक्ष हे मुंबईवर लागून राहिले असून आपल्या पक्षाचे मुंबईवर जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यात प्रामुख्याने आघाडीकडून सध्याच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
वरळीतून कोणाला देणार उमेदवारी
मुंबईसह राज्यात येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात होणार्या या विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष हे मुंबई शहारांवरील दहा जागांवर लागून राहिले आहे. मुंबईतील जागांवर कोणत्या पक्षांनी निवडणुक लढवावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून युती आणि आघाडींच्या नेत्यांमध्ये बैठकांचे फार्स सुरु झाले होते. मात्र, कोणत्याही पक्षांकडून अंतिम निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने यावर तोडगा काढण्यास यश मिळविले आहे. शनिवारी आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबईतील जागांचा तिढा सोडविण्यात यश आले असून दोन्ही पक्षांकडून आपले उमेदवारी देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वरळीतून कोणत्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची यावर चर्चा झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
धारावीतून वर्षा गायकवाड
दरम्यान, यात प्रामुख्याने काँग्रेसकडून धारावीतून वर्षा गायकवाड, अमिन पटेल यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. तर काँग्रेसकडून या उमेदवारांच्या यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पितृपक्षामुळे काँग्रेसकडून यादी जाहीर करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्याकडून देण्यात आली आहे. काँग्रेसकडून आतापर्यंत मुंबईतील काही नावांसह एकूण ६१ जणांची यादी तयारी करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत देखील शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून ‘आपलं महानगर’ला देण्यात आली आहे.
हेही वाचा – सेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेवर नजरा