तालुक्यातील चिरनेरच्या पुराला कारणीभूत ठरणार्या मध्यवर्ती नाल्याचे खोलीकरण आणि बांध बंदिस्तीच्या कामाचे भूमिपूजन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या नाल्याच्या पाण्यामुळे चिरनेर येथे पूर येऊन शेकडो घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होते. यावर्षी देखील नाल्याला पूर येऊन 225 घरांमध्ये पाणी शिरले आणि त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या नाल्याचा गाळ काढून खोलीकरण करावे आणि नाल्याला संरक्षक भिंत बांधावी ही मागणी सातत्याने ग्रामस्थ करीत होते. भाजपचे नेते महेश बालदी यांनी यासाठी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला. दीड किलोमीटर लांब या नाल्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटची सरक्षक भिंत, गाळ काढून तळाला काँक्रिटीकरण करणे असे हे काम आहे.
या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, उद्योजक आणि खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, पंचायत समिती सदस्या शुभांगी पाटील, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.