‘महाराष्ट्र विकास आघाडीनं शेतकऱ्यांसाठी पहिलं आणि महत्वाचं पाऊल उचललं. माझ्या शेतकऱ्याला २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार. कोणत्याही जाचक अटीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे स्वागत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. यासंबंधीत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
इडा पिडा टळली… बळीचं राज्य आलं!
महाराष्ट्र विकास आघाडीनं शेतकऱ्यांसाठी पहिलं आणि महत्वाचं पाऊल उचललं.माझ्या शेतकऱ्याला २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार.कोणत्याही जाचक अटीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन! #FarmerLoanWaiver pic.twitter.com/1uWn2dLs0j— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2019
अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद निर्णय
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही अटी न घालता, कसल्याही लाईनीत उभं न करता, कोणतेही ऑनलाईन किंवा कसलेही अर्ज न भरायला लावता ‘महात्मा फुले योजनेअंतर्गत’ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा शनिवारी महाविकास आघाडी सरकारनं केली. हा अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद निर्णय असून, शेतकऱ्यांना दिलासा देणारं निश्चितच हे आपलं सरकार आहे, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
दरम्यान या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पीक कर्ज घेतलेले सर्व शेतकरी सरसकट या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच त्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज-विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर मंत्री, आमदार-खासदार तथा शासकीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असंही सरकारच्या वतीने घोषित करण्यात आलं आहे. मार्च २०२० पर्यंत या योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष जमा करण्यात येणार असल्याचेही घोषित करण्यात आलं. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलं महत्वाचं पाऊल असून निश्चितच ‘ईडा – पीडा टळून बळीचं राज्य आलं’ असं म्हणणं सार्थ ठरेल असं आ. मुंडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – समृद्धी महामार्गासाठीचा पैसा राज्य सरकारच उभारणार