माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे येत्या सप्टेंबर महिन्यात भाजपामध्ये आपला पक्ष विलीन करत भाजपप्रवेश करणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. शिवसेना नेते आणि गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. ‘नारायण राणे यांना युतीत घेणं म्हणजे युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखं’ असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच ‘मला वाटत नाही मुख्यमंत्री असा निर्णय घेतील, कारण त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले आहेत’, असे देखील केसरकर यावेळी म्हणाले.
वाचा सविस्तर – राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपात होणार विलीन
‘महाराष्ट्रात सध्या गोड सुरू आहे’
दरम्यान, भाजप शिवसेना मनाने एकत्र आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सर्व गोड सुरू असल्याचं सांगत ‘दुधात साखर चांगली आहे, त्यात मिठाचा खडा कशाला?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. एवढंच नाही, तर ‘राणेंकडे सध्या काय आहे? एक आमदारकी आहे. पण भाजपा आणि शिवसेनेने जोर लावला तर तीही जाईल’, अशी टीका देखील त्यांनी केली.
हेही वाचा – ‘राणे काँग्रेसमध्ये गेले नसते, तर आजचं चित्र वेगळं असतं’
राष्ट्रवादीची तोफ शिवसेनेत जाणार?
दरम्यान, एकीकडे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर चर्चा सुरू असतानाच तशीच चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ समजले जाणारे छगन भुजबळ यांच्या घरवापसीवर देखील होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच छगन भुजबळ शरद पवारांसोबत आहेत. मात्र, त्यांनी पुन्हा शिवसेनेचा रस्ता धरल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सुप्रिया सुळेंच्या बैठकीला जाणं देखील टाळल्यामुळे ते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तबच झाल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.