मुंबई : राज्यात गेल्या चार दिवस सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज, मंगळवारी रात्री जवळपास सव्वातास चर्चा झाली. पवार यांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’मध्ये बंद दाराआड झालेल्या या चर्चेत नेमका कशावर खल झाला, हे मात्र स्पष्ट झाले नाही. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या.
अदानी प्रकरणातील संयुक्त संसदीय समिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी, ईव्हीएम या महाविकास आघाडीत वादग्रस्त आणि विसंवादाच्या ठरलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील समजू नसला तरी या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात देखील यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
#MyMahanagar @NCPspeaks @PawarSpeaks @OfficeofUT @rautsanjay61 @supriya_sule https://t.co/zvlhPqsoxw
— My Mahanagar (@mymahanagar) April 11, 2023
महाविकास आघाडीत गेल्या चार- पाच दिवसांत अनेक मुद्द्यांवर मतभेद झाल्याचे दिसून आले. यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ टिकणार की झाकली मूठ राहणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातील प्रकरणाची जेपीसी चौकशी या विषयावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान मतभेद असल्याचे दिसले आहे. भाजपाविरोधातील मुद्द्यांवर काँग्रेस आणि ठाकरे गट हा एकत्र दिसत होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळ्या वाटेने चाललेली दिसत होती.
गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात वज्रमूठ एक करत राज्यभरात सभा घेण्याचा धडाका लावला आहे. या सभांना प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीत वादाची ठिणगी पडते की, काय असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीला महत्त्व आले आहे. आघाडीतील मतभेदांचे रुपांतर मनभेदात होऊ नये, यासाठी ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.