मुंबई : भाजपाने आज, बुधवारी सायंकाळी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 72 उमदेवारांची नावे असून त्यात महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली असून पीयूष गोयल, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मिहीर कोटेचा यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते वाशिम येथील जनसंवाद मेळाव्यात बोलत होते. (Horses bathe in the Ganges even today After Nitin Gadkari got candidature Uddhav Thackeray attacked BJP)
उद्धव ठाकरे म्हणाले की, 1987 साली पार्ल्याची पोटनिवडणूक होती. त्यावेळेला शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि प्रभाकर कुंटे काँग्रेसचे उमेदवार आपल्यासमोर होते. देशातील पहिली पोटनिवडणूक जेव्हा भाजपा आपल्या विरोधात होती आणि शिवसेना एकटी होती. त्यावेळेला हिंदूत्वाच्या विषयावर ती निवडणूक नुसती लढवली नाही तर ती जिंकलीही. तेव्हा भाजपा गांधीवादी समाजवाद करत होती. भाजपाचे देशात दोन खासदार होते. भाजपाला तेव्हा कळलं की, हिंदू हा वेगळा विचार होऊ शकतो आणि हिंदूत्वाच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू शकतो. परंतु शिवसेना प्रमुखांनी निवडणूक जिंकून दाखवली म्हणून तुम्ही आमच्यासोबत आलात. तेव्हा नरेंद्र मोदी हिमालयात असतील किंवा थोडक्यात त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला असेल, पण हिंदूत्वामध्ये ते कुठेच दिसत नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – Raigad Crime : बैलगाडा शर्यतीत शिंदे-भाजपा गटात राडा; एकाने काढली बंदूक
आज तरी घोडं गंगेत न्हालं
मी तुमच्या सर्वांची आणि महाराष्ट्रासमोर दिलगीरी व्यक्त करतो की, 2014 साली आणि 2019 साली यांना मत द्या हे सांगायला मी याठिकाणी आलो होतो. तेव्हा मला कळलं नाही की, यांचा हा हिंदूत्वाचा हा बुरखा आणि मुखवटा आहे आणि त्या मुखवट्याच्या आड यांचा विभत्स आणि विकृत चेहरा दडलेला आहे, हे मला आता कळलं. तिथून जी सुरुवात झाली यांचे फक्त दोन खासदार होते. प्रमोद महाजन आले, गोपीनाथ मुंडे आले, नितीन गडकरी याचं बरं आज तरी घोडं गंगेत न्हालं, आज तरी त्यांना तिकीट मिळालं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.