मुंबई : राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून विरोधकांनी वारंवार टीका केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे महानौटंकी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. तर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यातील गोदाबाई यांच्या हलाखीच्या स्थितीची माहिती देताना ‘शासन आपल्या दारी’वर निशाणा साधला.
हेही वाचा – महाराष्ट्रात आता जुगार बचावो मंत्रालय सुरू होणार नाही ना? ठाकरे गटाचा खोचक सवाल
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जातेगावातून युवा संघर्ष यात्रा जात असताना आमदार रोहित पवार यांना गोदाबाई भेटल्या. त्यांच्या मुलाच्या ह्रदयाला छिद्र असून मुलाचे ऑपरेशन कसे करायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. गोदाबाई यांचे पक्के घर नसून पत्र्याचे आहे. घऱात गॅस आहे, पण गॅस भरायला परवडत नसल्याने तो कोपऱ्यात फेकून त्या चुलीवर स्वयंपाक करतात. दूध घ्यायला परवडत नाही, म्हणून त्या नातवंडांना बिनदुधाच्या चहामध्ये पाव खायला देतात. शौचालय बांधले, पण टाकी बांधली नाही. शिवाय, शौचालयाचे अनुदान कोणीतरी परस्पर काढून नेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आदरणीय मुख्यमंत्री साहेब,
या आहेत गोदाबाई,युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातील जातेगावातून जात असताना गोदाबाई यांची भेट झाली.त्यांच्या मुलाच्या ह्रदयाला होल आहे मुलाचं ऑपरेशन कसं करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.त्याचे घर देखील पत्र्याचे आहे,पक्के घर नाही. गॅस आहे पण गॅस… pic.twitter.com/TtF48xPLp6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 23, 2023
‘शासन आपल्या दारी’चे मोठमोठे कार्यक्रम – इव्हेंट केले जातात. कार्यक्रमाच्या नावात ‘आपल्या दारी’ असे म्हटले असले म्हणजे शासन लोकांच्या दारी पोहोचत नसते. तसेच व्यथा समजून घेण्यासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्मणे अथवा साधा चमचा घेऊन जन्मणे याचा काही संबंध नसतो; तर लोकांच्या व्यथा समजण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या असतात, असे त्यांनी सुनावले आहे. तो प्रामाणिकपणा आणि संवेदना आपल्याकडे देखील असेल असे समजून गोदाबाईच्या कुटुंबाच्या व्यथा आपण सोडवाव्यात, असे आवाहन रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळ्यांचा ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच… ठाकरे गटाची बोचरी टीका