गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणारा मान्सून विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात दाखल झाला असून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, अजूनही मुंबई कोरडीच आहे. रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत मजल मारलेला मान्सून मुंबई – ठाण्यात कधी येणार याकडे प्रत्येक जण चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. यापूर्वी दोन ते तीन वेळा मान्सूनच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, पुन्हा एकदा पावसाने पलटी मारली आहे. आता हा मान्सून २६ जून रोजी मुंबईत दाखल होईल, असा नवा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, आता तरी हा अंदाज खरा ठरेल की मान्सून पुन्हा टांग देईल, हे येत्या चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.
यामुळे मान्सून थांबला
दक्षिण गोव्यापासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूनसाठी कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात पाऊस पडत आहे. कमी दाबाचे हे क्षेत्र किंवा सिस्टीम पुढे उत्तर कोकणपर्यंत सरकल्यानंतरच मुंबईत खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा – खूशखबर! अखेर तळकोकणात मान्सूनचे आगमन