बीड : यंदाच्या वेळी मराठा समाजाकडून आरक्षणासाठी करण्यात आलेले आंदोलन हे चिघळले होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यातील अनेक बऱ्याचशा भागांत जाळपोळ करत वाहने अडवली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. मराठ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात अंदाजे 12 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडून देण्यात आली आहे. परंतु, मराठा आंदोलकांचा सर्वाधिक रोष हा बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. 30 ऑक्टोबरला आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी सुरुवातील अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर या जमावाने आक्रमक होत बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला लक्ष केले. (Jaydatta Kshirsagarwas enraged by the incident of arson in Beed)
हेही वाचा – एक फुल दोन हाफ सरकार भाजपाचे मांडलिक झाले असून… नाना पटोलेंचा हल्लाबोल
मराठा आंदोलकांनी क्षीरसागर यांच्या बंगल्यावर साधारणतः दीड ते दोन तास दगडफेक केली. त्याशिवाय त्यांच्या घराच्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. ज्यामध्ये क्षीरसागर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. पण या घडलेल्या घटनेवरून आता ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला आहे. घडलेल्या या घटनेबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, “अतिरेक्यांनाही लाजवणारा हा प्रकार आहे. ब्रिटिश आणि निजामाच्या काळात देखील अशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी लावावा. त्याचबरोबर जमावाचा उद्देश फक्त जाळपोळ करण्याचा होता की कोणाच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा होता, याचा सुद्धा शोध घ्यावा,” असे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
बीडमध्ये अचानक घडलेल्या या हिंसाचारामुळे या ठिकाणी संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 150 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. हातामध्ये दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ घरावर पेटवून दंगा करणारे हे तरुण 25 वयोगटातील होते, अशी माहिती देण्यात आली आहे. . विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या हाती पाच अल्पवयीन तरुण सुद्धा लागलेत. हे पाच अल्पवयीन याच जमावामध्ये सहभागी झाले होते. 120 तरुणांमध्ये बहुतांश तरुण 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे.