पक्षी प्रेमींसाठी प्रिय असलेले कर्नाळा अभयारण्य वन विभागाने राबविलेल्या अनोख्या उपक्रमामुळे प्लास्टिक मुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे अभयारण्य कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर विविध जातीचे पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती यांनी समृद्ध आहे. १२.११ चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला राखीव वन क्षेत्राचा दर्जा घोषित झाला आहे. अभयारण्यात जाताना पर्यट, ट्रेकर्स खाण्याचे पदार्थ, पाणी घेऊन जातात, ज्यासाठी प्लास्टिकचा वापर केलेला असतो. या प्लास्टिकने वन्यजीवांच्या अस्तित्वाला, तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्यामुळे उपवनसंरक्षक (वन्यजीव, ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचार्यांनी अभयारण्यालगतच्या गावातील समित्यांना विश्वासात घेतले. अभयारण्यात जाताना पर्यटकांच्या साहित्याची तपासणी करून त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची नोंद घेतली जाऊ लागली.
प्लास्टिकचे सामान असल्यास त्याबदल्यात त्यांच्याकडून सुरुवातीला २०० रुपयांची अनामत रक्कम ठेवून घेतली जाऊ लागली. ही रक्कम नंतर १०० करण्यात आली. ग्राम विकास समिती कल्हे यांच्यामार्फत शुल्क वसूल केले जाते. त्यातून रोजंदारीवर मजूर लावून पर्यटकांकडून अनावधानाने राहिलेला कचरा दर सोमवारी उचलला जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. प्लास्टिकची पाण्याची बाटली आणि शीतपेयाच्या बाटल्याची अनामत रक्कम वसूल करण्यासाठी अभयारण्यातील तीन बचत गटांना सूचना देण्यात आल्या आहेत.