राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी हा ३ मार्च ते २४ मार्च असा असणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजात प्रामुख्याने राज्यपालांचे अभिभाषण, राज्यपालांच्या भाषणावर अभिनंदनाचा ठराव आणि भाषणावर चर्चा असा पहिल्या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यासोबतच शोकप्रस्ताव, शासकीय कामकाज हा पहिल्या आठवड्याच्या कामाचा भाग आहे. दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान , पुरवणी विनियोजन विधेयक, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव, विरोधी पक्षाचा प्रस्ताव असा कार्यक्रम असेल. तर राज्याचा ११ मार्चला मांडण्यात येणारा अर्थसंकल्प या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा महत्वाचा भाग आहे. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर दोन दिवस या अर्थसंकल्पावर चर्चा असणार आहे. त्यानंतर दोन दिवस अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चा असणार आहे. तिसऱ्या आणि अंतिम आठवड्यातही अर्थसंकल्पीय मागण्यांवर दोन्ही सभागृहात चर्चा पार पडणार आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरूवात होत आहे. यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे आहे. यंदा ३ मार्च ते २४ मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे ३ मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३ मार्चला सकाळी ११ वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहातून दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करणार आहेत. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चेचा प्रस्तावही यंदाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचा भाग आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने पहिल्या दिवसाची सुरूवात होईल. तर विधानसभा आणि विधान परिषदेतील दिवंगत आमदारांचा शोक प्रस्तावही पहिल्याच दिवशी मांडण्यात येईल.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमधील नवनवीन वादाचे मुद्दे गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा दिसून आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा हा हिवाळी अधिवेशनातही गाजला होता. हिवाळी अधिवेशनामध्ये आवाजी मतदानाची पद्धत घटनाबाह्य असल्याचे ताशेरे हे राज्यपालांनी ठाकरे सरकारच्या निवडणुकीच्या प्रस्तावावर ओढले होते. त्यामुळे त्या अधिवेशनात ही निवडणूक होऊ शकली नाही. यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारकडून मांडण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी असा मुद्दा कॉंग्रेसकडून मांडण्यात आला आहे. तर ठाकरे सरकारने ९ मार्चला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी असा प्रस्ताव राजभवनला पाठवण्यात येणार आहे.
अजित पवारांच्या पेटाऱ्यातून काय निघणार ?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च रोजी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असतानाच यंदाचा अर्थसंकल्प हा ठाकरे सरकारसाठी अर्थव्यवस्था रूळावर आणण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यातील शेतकरी वर्गापासून, श्रमिक, लघु मध्यम ते मोठे उद्योग या सगळ्याच क्षेत्राला कोरोनामुळे झळ बसली आहे. अशातच अर्थमंत्री अजित पवार यांच्या पेटाऱ्यातून सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्या योजना आणि घोषणांचा वर्षाव होणार हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. राज्यात येत्या काळात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही सगळ्याच राजकीय पक्षांचे यंदाच्या अर्थसंकल्पावर लक्ष लागून आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका असलेली शहरे लक्षात घेता या निवडणुकीसाठी नेमके काय पॅकेज जाहीर होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे.