बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्लास्टिक कपाचा वापर केल्यामुळे जिल्हाधिकारी अस्तेक कुमार पांडे यांनी ५ हजार रुपायांचा दंड स्वतःकडून वसूल केला आहे. ही बाब त्यांना एका पत्रकाराने लक्षात आणून दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यादरम्यान ही घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पत्रकारांना पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिक कपातून चहा देण्यात आला होता. यावेळी एका पत्रकाराने ही बाब लक्षात आणून दिली आणि हा प्लास्टिक बंदीचे उल्लघंन असल्याचा दावा केला. तेव्हा या सर्व प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी अस्तेक कुमार पांडे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्याला विभागाने केलेली चूक कबूल केली आणि दंड भरला.
हेही वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीचा मित्रपक्षांना ठेंगा!
गेल्या आठ दिवसांमधील ही दुसरी घटना
दरम्यान पत्रकार परिषद संपल्यानंतर अस्तेक पांडे यांनी दंड भरला. राज्य विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी प्लास्टिक बंदी अंमलबजावणीसाठी जास्त प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक संबंधित दंड लावण्याची ही दुसरी घटना घडली आहे. मागील घटनेत मतदान केंद्राने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या ठेवीची रक्कम ही प्लास्टिकच्या पिशवीतून आणली होती. उल्लघंन केल्याची बाब अधिकाऱ्याला लक्षात येताच ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता.
सर्व मतदार केंद्रामध्ये देखील पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी
राज्यात पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार पुनर्वापर न करताना येणाऱ्या प्लास्टिकवर देशाभरातील सरकारी कार्यलयात बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जनजागृती करण्यासाठी सर्व मतदार केंद्रामध्ये देखील पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे.