मुंबई : महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाने 3 तर शिवसेना शिंदे गटाने एका उमेदवाराला राज्यसभेवर पाठवले आहे. भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून काँग्रेसमधून गेलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राज्यसभेसाठी काँग्रेसमधून आलेल्या दोघांना उमेदवारी दिलेल्या आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics Dag Achhe Hai campaign by BJP Criticism of Thackeray group after Rajya Sabha candidature)
हेही वाचा – Maharashtra Politics : राज्यसभेची यादी पाहिल्यानंतर कीव येते; नाना पटोलेंचा महायुतीवर निशाणा
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, भाजपा काँग्रेस मुक्त राजकारण, घराणेशाही मुक्त राजकारण आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण असा दावा करत आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजपा पुरस्कृत खोके सरकार कदाचित महाराष्ट्र काँग्रेसच्या तीन लोकांना राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व घराणेशाहीचे आहेत. गेल्या 40 दिवसांत काँग्रेस सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय आणि त्यांच्यापैकी किमान 2 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. काँग्रेसविरोधात लढणारे भाजपाचे कार्यकर्ते गेले कुठे? विशेषत: जे काँग्रेसचा द्वेष करतात? असे सवाल करत सर्व भ्रष्टाचारी महाराष्ट्र भाजपामध्ये सामावून घेत आहेत. मला वाटते आता भाजपाची मोहीम ‘अच्छे दिन नाही, तर दाग अच्छे है’, अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
For all the claims of Congress- mukt politics, dynasty- mukt politics and corruption- mukt politics, the bjp sponsored khoke regime in Maharashtra is probably sending 3 @INCMaharashtra people to the Rajya Sabha.
They are all belonging to dynasties, they have all hopped over in…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 14, 2024
हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
नाना पटोले यांचाही भाजपावर निशाणा
राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आज भाजपाची आणि त्यांच्या सहयोगी पक्षाची यादी पाहिल्यानंतर आम्हाला कीव येते आहे. कारण आयुष्यभर मेहनत करून ज्यांनी आत्तापर्यंत भाजपा मोठा केला, त्यांच्यासाठी जागा नाही. मात्र आयात केलेले जी लोकं आहेत, त्यांच्यासाठीच जागा आहे. अशा पद्धतीचा एक संदेश आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे मूळ भाजपाला एक गोष्ट समजली पाहिजे की, तुम्हाला सतरंज्याच उचलायच्या आहेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.