मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काही नेत्यांकडून अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याचं वक्तव्य करण्यात येत आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याचा दावा केला आहे.
संजय शिरसाट यांनी ते भाजपात का जाणार आहेत, याची कारणंही सांगितली आहेत. यावेळी संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. त्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नाहीत. ते एवढे आजारी होते का? की, ते सभेला आले नाहीत. आज तेच नाना पटोले सुरतला कोर्टात चालले आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले.
काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाहीये. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचं जमत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील, असं शिरसाट म्हणाले.
बाळासाहेब थोरात जाणार नाहीत?
अशोक चव्हाण भाजपात जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी देखील घडल्या आहेत. बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत. कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे, असं शिरसाट म्हणाले.
हेही वाचा : डीएडचा अभ्यासक्रम बंद; शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना बीएड करणे बंधनकारक