मुंबई : देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यावरून विरोधकांनी राज ठाकरे यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एका चित्रपटाचा फोट शेअर करत राज ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. (MNS: Jitendra Awhad’s criticism of Raj Thackeray while sharing the dialogues from the movie Sinhasan)
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल, मंगळवारी गुढी पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे महायुतीत सहभागी होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी या मेळ्याव्यात मांडली.
आठवतो का हा सिनेमा….
जय सत्यनारायणा एकदा तरी मुख्यमंत्री बनवाच …#सिंहासन pic.twitter.com/sHDWQIxsSD— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2024
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 1979 साली झळकलेल्या ‘सिंहासन’ या लोकप्रिय एव्हरग्रीन चित्रपटातील एक फोटो आणि संवाद शेअर करत राज ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेवर शरसंधान केले आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका करणारे अरुण सरनाईक हे आनंदराव (श्रीकांत मोघे) यांच्याकडे कोकणातील हालहवाल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. कोकणातील नेत्यांचे आणि विदर्भातील नेत्यांची जवळीक वाढल्याचे मुख्यमंत्री सांगतात, तेव्हा श्रीकांत मोघे म्हणतात, तुम्हाला सांगू आबा (मुख्यमंत्री) सगळ्या असंतुष्टांचं सर्व असंतुष्टांशी थोडा थोडा वेळ जमते. हाच संवाद शेअर करताना जितेंद्र आव्हाड यांनी, आठवतो का हा सिनेमा…. जय सत्यनारायणा एकदा तरी मुख्यमंत्री बनवाच…, अशी टिप्पणी केली आहे.
हेही वाचा – Thackeray VS Thackeray : आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही; राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
ठाकरे गटाची टीका
राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाने त्यावर टीका केली आहे. स्वाभिमान, धर्माभिमान, देशाभिमान आहे, तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा. आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही. आमच्या मातीचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणाने जपायचा आहे, असे ट्वीट ठाकरे गटाने केले होते.