महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने २९ जूनला आत्महत्या केली. या आत्महत्येवर राज्यभरातून हळहळ व्यक्त होतेयं. तर स्वप्नीलच्या आत्महत्येचे पडसाद विधानसभेतही उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते अमित ठाकरे स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची पुण्यात भेट घेतली. यावेळी लोणकर कुटुंबाचं सात्नव केले. तसेच ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावतीने २ लाख रुपयांचा चेक मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाच्या हाती सूपुर्त केला. त्याचबरोबर पक्ष नेहमी पाठशी राहील असे आश्वासन अमित ठाकरे यांनी दिले.
स्वप्नील लोणकरच्य आत्महत्येप्रकरणी अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससी परीक्षांवरून राज्य सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दात टीका केली. ‘एमपीएससी’ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर ‘एमपीएससी हे मायाजाल आहे’ असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच ‘एमपीएससी’ परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल, अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली होती.
या फेसबुक पोस्टनंतर आज अमित ठाकरेंनी प्रत्यक्ष जाऊन स्वप्नीलच्या लोणकरच्या आई-वडीलांची पुण्यातील दौंड येथील केडगावमध्ये जाऊन भेट घेतली. स्वप्निल याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर राज्य सरकारला जाग येत आता ३१ जुलैपर्यंत एमपीएसच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ मार्गी लावणार असे जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकुण १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेमुळे आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जाहीर केले.