राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान १८ जूनपर्यंत तरी मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. ३१ मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु १ जूनपासून पूर्व–विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा २०–३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाईदेखील करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
१२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल
अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, कोकण किनारपट्टी भागात मान्सूनची हजेरी यंदा लांबणार असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. मात्र यावेळी पावसाचा जोर असणार नाही. गेल्या वर्षी किनारपट्टी भागात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. मात्र, त्यापुढील वाटचाल झाली नव्हती. मान्सून दाखल होऊन त्याची पुढील वाटचाल कशी होते? हे महत्त्वाचे आहे. यंदा किनारपट्टी भागातच मान्सून पाच ते सहा दिवस उशिरा दाखल होणार आहे. तसेच पाऊस झाल्यास तो १ सेटींमीटरच्या आसपास राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे त्याचे राज्यातील आगमनही आणखी लांबेल, असे दिसते.
वाचा – पाऊस उशीरा येणार; शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे
वाचा – विधानसभा निवडणूकीपूर्वी दुष्काळी भागात पाडणार कृत्रिम पाऊस