मेट्रोमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होणार आहे. मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका येत्या काळात महाराष्ट्राला बसणार हे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ आर्थिक स्थिती धोक्यात आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा, मंदीचा येणार म्हणजे अजून लाखो लोकांच्या नोकर्या जाणार आहेत. अनेक बँका बुडणार आहेत, अशी ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे?, असा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे आयोजित प्रचार सभेत केला.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात १४ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केली. हा आकडा खूप मोठा आहे, मात्र तुम्हाला याचा अंदाज येणार नाही. याचा अर्थ दिवसाला तीन तासाला एक आत्महत्या या प्रमाणात शेतकर्यांनी गेल्या पाच वर्षात आत्महत्या केल्या आहेत, असे सांगत २ हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने छापणे बंद केल्याची बातमी मध्यंतरी वाचली. म्हणजे पुन्हा तुम्हाला रांगेत उभे राहावे लागणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. मुंबईत येणारी मेट्रोच मुंबईतील मराठी माणसाचा घात करणार आहे.
जिथे दळणवळणाची अशी साधने येतात, तिथे जागांचे भाव गगनाला भिडतात. आता मुंबईतले भाव तुमच्या हाताबाहेर जाणार. आरेतली एका रात्रीत २१०० झाडे कापून टाकली. आणि नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात आम्ही सत्तेत आल्यानंतर आरे जंगल घोषित करू. पुन्हा झाडे लावणार आहात का? रात्री लोक झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून करणारा रामन राघव मला आठवतोय. आरेमध्ये रात्री जाऊन झाडे कापणारे हे सरकार रामन राघवच आहे, असेही आरोप राज ठाकरे यांनी केला.
आज तुम्ही म्हणताय, १० रुपयांत थाळी देऊ. निवडणुका झाल्यानंतर तुम्ही म्हणाल १०० रुपयांना थाळी घ्या. मागच्या निवडणुकांमध्ये टोलमुक्तीचे आश्वासन दिले. नंतर केंद्रातले प्रतिनिधी म्हणाले, टोलमुक्ती शक्य नाही. किमान जाहीरनाम्यात दिलेला शब्द तरी पाळा!, असा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला. टक्केवारीच्या व्यवहारामुळेच मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे भरले जात नाहीत. मुंबई महानगर पालिका वर्षाला त्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी २०० कोटी खर्च करते, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.