येणारे नवे वर्ष MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे. कारण राज्य सरकारने MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. २०१९मध्ये MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. परीक्षा होऊन २ वर्ष लोटून गेली तरीही विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नाहीत म्हणून मागच्या काही काळात विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला धारेवर धरत आत्मदहनाचा इशारा दिला होता. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून २०१९च्या बॅचमधील तब्बल ४१३ विद्यांर्थ्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. १७ जानेवारी पासून या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नव्या वर्षात MPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
MPSC परीक्षा होऊन दोन वर्ष पूर्ण झाली तरीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. २८ सप्टेंबर २०२१ रोजी २०१९मधील परीक्षांचा सुधारित निकाल लावण्यात आला. राज्य सरकारच्या सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर विरोधी पक्षाने देखील अनेक वेळा ताशेरे ओढले. राज्यातील गंभीर प्रश्नांवर सरकार कोणतेही ठोस निर्णय घेत नसून राज्य हरले आहे अशा टीका करण्यात आल्या होत्या. राज्यातील सरकार राज्यातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना शेरोशायरीवर भर देत असल्याचे देखील म्हणण्यात आले होते.
सरकारचा भोंगळ कारभार, भरती परीक्षांमध्ये सुरू असलेले भ्रष्टाचार त्यातच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांसाठी विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि MPSC २०१९ च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हेही वाचा – टीईटी घोटाळा : व्हॉट्स अॅपवर पास, प्रत्यक्षात नापास