नाणार प्रकल्पात सुरु आहे मांडवली, खरं सांगा किती मिळाली दलाली…
म्हणे नाणार जाणार, नाणार जाणार,
खोटं बोलणं सोडायला सांगा तुम्ही किती घेणार…
या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…
पीक विम्याची नुकसानभारपाई मिळालीच पाहिजे…
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे…
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…
फेकू सरकार हाय हाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आज विधानभवन परिसर दणाणून सोडला. अधिवेशनामध्ये आज काय काय घडणार याची झलकच विरोधकांनी दाखवून दिली.
नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले. आंदोलनामध्ये पीकविमा नुकसान भरपाई, बोंडअळीची नुकसान भरपाई याविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभागृह सुरु होण्याअगोदर विरोधकांनी हे आंदोलन करत सरकारला एकप्रकारचा इशाराच दिला आहे.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार राजेश टोपे, आमदार विजय भांबळे, आमदार वैभव पिचड, आमदार विक्रम काळे आदींसह सर्व आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान आदींसह इतर आमदारही सहभागी होते.