पंचवटी : पेठरोडवरील एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना भोजन पुरवठा करणार्या सेंट्रल किचनकडून निकृष्ठ भोजन पुरवठा होत असल्याचा आरोप करत अन्नत्याग आंदोलन केले. दरम्यान, सायंकाळपर्यंत आंदोलनावर कुठलाही तोडगा निघाला नव्हता.
पेठरोडवरील आदिवासी विभागाच्या वसतिगृहात एकलव्य शाळेत ३९४ विदयार्थी व विद्यार्थिनींसाठी शिक्षणाची व राहण्याची सुविधा आहे. यात ६ वी ते १२ वीचे विदयार्थी व विद्यर्थिनी शिक्षण घेत आहे. त्यांच्या भोजनासाठी आदिवासी विभागाने काही वर्षांपूर्वी सेंट्रल किचन संस्थेकडे काम दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून पुरवठा होत असलेले अन्न निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.६) दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यापूर्वी संबधित ठेकेदार कंपनीला वारंवार सांगून तसेच लेखी तक्रार करूनदेखील जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप करत यावेळी शाळेतील प्राचार्य देवरे, गृहपाल महेश दामले यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही.
भाजीत पाणी असल्याने चव लागत नाही. मशीनने केलेल्या पोळ्या कच्या राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होतात. त्यामुळे यापुढे आम्हाला हाताने तयार केलेल्या चपात्या मिळाव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे.– मुकेश पावरा, विदयार्थी
विद्यार्थ्यांनी चांगले जेवण मिळत नसल्याने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करून घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.– सुरेश देवरे, मुख्याध्यापक
मुंडेगाव येथील सेंट्रल किचन येथून नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३० ते ४० आश्रमशाळांना अन्न पुरविले जाते. हा अन्नपुरवठा बंद करून संबधित ठिकाणीच किचन करावे. आदिवासी समाजाच्या मुलामुलींवर होणारा अन्याय थांबावावा. – लकी जाधव, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद