नाशिक : मार्कंडेय पर्वतावर ऋषी पंचमीला यात्रा उत्सव भरण्याची जुनी परंपरा आहे. मात्र यंदा या उत्सवाला खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी (दि. २०) यात्रा भरविण्यासाठीची परवानगी संभाव्य धोके लक्षात घेता प्रशासनाने नाकारली आहे. ऋषी पंचमीला मार्कंडेय पर्वतावर यात्रा भरविण्यासाठीचा परवानगी अर्ज प्रशासनाकडे करण्यात आला होता.
याबाबत गोबापुर ग्रुप ग्रामपंचायत व इतर ग्रामस्थांनी हा अर्ज केला होता. अर्ज प्राप्तीनंतर आपत्ती व्यवस्थापन, तहसीलदार कळवण, मंडळ अधिकारी कळवण, पोलीस निरीक्षक कळवण यांचेकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यात सोमवती अमावस्येला मार्कंडेय पर्वतावर दगड कोसळून पाच ते सहा भाविक जखमी झाले होते. तसेच पर्वताच्या पहील्या टप्यावर असणारा लोखंडी पूल अरुंद व कमकुवत आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्वतावर जाण्यासाठीच्या पायवाटा निसरड्या आहेत. बारीतील रस्ता अरुंद असल्याने बारीमधे यात्रा लावणेसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे परवानगी नाकारण्याचा अभिप्राय देण्यात आला.
मार्कंडेय पर्वतावर ऋषी पंचमीला राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात येत असलेल्या गर्दीमुळे अप्रीय घटना भूतकाळात घडलेल्या आहेत. पर्वतावर जाताना सपाटी भागाजवळ जाण्यासाठी अरुंद लोखंडी जिना आहे. तो जिर्ण व तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पर्वतावर जाणारे व येणारे भाविकांत चेंगरा चेंगरी होऊन दुर्घटना घडू शकते. हे संभाव्य धोके लक्षात घेता उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांनी यात्रेला परवानगी नाकारली आहे. ऋषी पंचमीला मात्र पहिल्या पायरीचे दर्शन भाविकांना घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहनतळ व पार्किंग मुळाणे व गोबापूर गावात करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.