कळवण तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन चणकापूर धरणाजवळ असलेल्या पुलाचा दोन वर्षांपूर्वी कोसळलेला काही भाग ‘जैसे थे’च असून दोन वर्षांपूर्वी पूल कोसळून अद्यापही दुरुस्ती न झाल्याने या कामाला मुहूर्त लागणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
चणकापूर धरणासमोर असलेल्या नदीवर कनाशीकडे जाणार्या रस्त्यावर हा पूल आहे. २०१३ म्हणजेच अवघ्या सात वर्षापूर्वी या पुलाचे काम झाले. सहा वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने निकृष्ट कामाचे कळवण तालुक्यातील आणखी एक उदाहरण समोर आले होते. या मार्गाचा वापर परिसरातील शेतकरी, नागरिक आणि येथे येणारे पर्यटक करत असतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ह्या पुलाची मोडतोड झाली. दोन वर्षे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाकडे ढुंकूनही बघितले नसल्याने या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. या पुलाचा वापर करणार्या नागरिक आणि पर्यटकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत असून अपघाताची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांसह शेतकरी व पर्यटकांनी केली आहे.