राणा दामप्त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब आणि ५०० ते ६०० शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस गुन्हा दाखल करुन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
राणा दाम्पत्यांनी खार पोलिसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, ॲड. अनिल परब आणि शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी घरावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. आम्ही घराच्या बाहेर निघताच आम्हाला जिवानिशी ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. एवढेच नव्हेतर आम्हाला मारहाण केल्यानंतर आम्हाला हॉस्पीटल मध्ये नेण्याकरीता ॲम्ब्युलंस सुध्दा तयार ठेवलेली आहे. यावरून शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत, ॲड. अनिल परब हे आमच्या घरा समोर जमलेल्या गैरकायदेशिर असामाजिक तत्वांना आम्हाला जिवानिशी मारण्याकरीता चिथावणी देत आहेत हे स्पष्ट होते, असं राणा दाम्पत्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. चिथावणी देणाऱ्या या सर्वांना आमचा जीव घेण्याचा कट रचल्याचा तसेच त्याकरीता तयारी केल्याचा आणि गैरकायदेशिर मंडळी आमच्या मुंबई येथील घरा समोर आम्हाला जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने जमवून तसंच आमच्या घराला वेढा देवून आम्ही घराबाहेर पडल्यास आम्हाला ठार मारण्याची सर्व तयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राणा दाम्पत्याने केली आहे.
राणा दाम्पत्याला अटक
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राणा दाम्पत्यावर १५३ अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या त्यांना न्यायालयात दाखल करणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आजची रात्र त्यांची पोलीस स्टेशनमध्येच जाणार आहे.
राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर आता उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. १५३ (अ), ३४, ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.
हेही वाचा – राणा दाम्पत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाणार