मुंबई : ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे शुक्रवारी पुण्यात गेले होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवरही हल्ला केला. यात काही महिला जखमी झाल्या, यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : मी गृहमंत्री असताना धमक्यांचे प्रकार थांबवले होते, भुजबळांचा इशारा कोणाकडे?
पुण्याच्या साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाआधी निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लावू असाही इशारा दिला होता. मात्र भाजपाने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली होती.
पंतप्रधान मोदी महिला सबल करण्याच्या गप्पा करतात. आणि त्यांचे भक्त हे महिलांना मारहाण करतात. गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर आता पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन घडवू लागले आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम झाले असेल, पण किती कार्यकर्त्यांना अटक झाली? हे सांगा.. फडतूसपणा बंद करा..… pic.twitter.com/NgcLGrAXDy
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 10, 2024
या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. दुसरीकडे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात निखिल वागळे यांची गाडी येत असताना भाजपाकडून त्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीत काही जण जखमी झाले. त्यात महिलांचाही समावेश होता.
हेही वाचा – Wadettiwar Vs Bangar : संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला अन् वडेट्टीवारांचा संताप…
याच अनुषंगाने आमदार अंबादास दानवे यांनी भाजपावर शरसंधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सबलीकरणाच्या गप्पा करतात आणि त्यांचे भक्त हे महिलांना मारहाण करतात. गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर, आता पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन घडवू लागले आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम झाले असेल, पण किती कार्यकर्त्यांना अटक झाली? हे सांगा. फडतूसपणा बंद करा, असे सुनावत त्यांनी एकप्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.