विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज कोकणात जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे आमदार .भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन भास्कर जाधव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राणे म्हणाले की, भास्कर जाधव कदाचित विसरले असतील की आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना जरा आठवण करून देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. त्यांना जे वाटत होतं, ही भीती त्यांना उद्धव ठाकरे असताना असायची. कारण तो भीती देणारा माणूसच होता. चपट्या पायांचा माणूस गेल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास तुम्हाला मी नक्की देतो, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबई-गोवा रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी पुढच्या दोन दिवसांसाठी लोकप्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. 25 तारखेपर्यंत सगळे खड्डे बुजवावेत असे आदेश दिले होते, असं नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा : बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा