आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. उद्धव ठाकरे-राजनाथ सिंह यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली असून लवकरच दोघांच्या भेटीची शक्यता आहे. या चर्चेमध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षांची चर्चा करण्याची जबाबदारी राजनाथ सिंह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर देण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रपती पदाबाबत समर्थन देण्याची मागणी केली आहे. एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह चर्चा करत आहेत. राष्ट्रपती पदाची निडणूक १८ जूलै रोजी होणार आहे. २९ जूनपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये रणनिती आखण्यात येत आहे. विरोधकांकडून मोर्चे बांधणी करण्यात येत असताना भाजपकडून उमेदवारावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.
राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, टीएमसीच्या ममता बॅनर्जी, आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा फोनवरुन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवारा समर्थन देण्याची मागणी केली आहे.
विरोधकांची मोर्चेबांधणी
राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेत्यांची दिल्लीत टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक आयोजित केली होती. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे बुधवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान शरद पवार यांनी भूषविले. या बैठकीला माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), मल्लिकार्जुन खर्गे (काँग्रेस), अखिलेश यादव (उत्तर प्रदेश), मेहबूबा मुफ्ती (काश्मीर), सुभाष देसाई (महाराष्ट्र), ई. करीम (केरळ), जयराम रमेश (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), टी. आर. बालू (तामिळनाडू), यशवंत सिन्हा (बिहार), रणदीप सूरजेवाला (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), राजा (तामिळनाडू) आदी १८ नेते उपस्थित होते.
हेही वाचा : राहुल गांधींना ईडीकडून दिलासा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवारी होणार चौकशी