मुंबई : नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती सुदैवाने टळली आणि हल्लेखोराच्या तावडीतून एक तरुणी बचावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच आमदार रोहित पवार यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा – Pune crime : गृहमंत्र्यांनाही बहुधा कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ नसावा, अजित पवार यांचा टोला
MPSC परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने पास झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे नावाच्या तरुणाला अटक केली. या घटनेला 10 दिवस झालेले नसतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात MPSCच्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील गजबजलेल्या सदाशिव पेठेत ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही महाविद्यालयीन तरुणी थोडक्यात बचावली आहे. या प्रकरणातील आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी हा मुलीचा मित्र असल्याचे सांगण्यात आले. हे दोघेही आधी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीसमोर प्रेम व्यक्त केले. पण तरुणीने त्याला नकार दिला.
राज्यात गुन्ह्यांचा आलेख रोज वाढतोय… महिला आणि मुली सुरक्षित नाहीत.. खून होतायेत… दरोडे पडतायेत… एकूणच राज्याची ‘कायदा आणि सुव्यवस्था’ ही केवळ सत्ताधारी आमदारांची दासी झाली की काय, असा प्रश्न पडलाय. आपण पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या राज्याचं सरकार चालवतो, याचं तरी… pic.twitter.com/HbNk8KqCSc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 27, 2023
आज, मंगळवारी सकाळी ही मुलगी कॉलेजला मित्रासोबत जात असताना त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तरुणीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लेशपाल जवळगे या तरुणाने धाडस करत आरोपीला पकडले. त्यानंतर आणखी एका तरुणाने लेशपालला मदत करत आरोपीला पकडून त्याच्या हातातील कोयता काढून घेतला. त्यामुळे ती मुलगी बचावली.
हेही वाचा – Pune crime : पुण्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका, सुप्रिया सुळेंचे गृहमंत्री फडणवीसांना आवाहन
यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात गुन्ह्यांचा आलेख रोज वाढतोय. महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. खून होत आहेत, दरोडे पडत आहेत. एकूणच राज्याची ‘कायदा आणि सुव्यवस्था’ ही केवळ सत्ताधारी आमदारांची दासी झाली की काय, असा प्रश्न पडला आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या राज्याचं सरकार चालवतो, याचे तरी भान या सरकारला आहे का? कुठे आहे सरकार? असे सवालही त्यांनी केले आहेत.